Advertisement

शूरवीर रामजी पांगेरा


दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला.
या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेले होते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला
मराठ्यांच्या ताब्यात होता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.

कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठा पायदळानिशी तळ ठोकून होता.
कारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होते रामजी पांगेरा.
हा रामजी विलक्षण शूर होते. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते. त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. तेच हे रामजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होते.
एक दिवस दिवसाउजेडी त्यांना हेरांनी खबर दिली की, औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामजीची फौज चिमूटभरच होती. ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते.

 पण रामजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला. ते आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभे राहीले.  दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठा तुकडीला समजलेच होते. रामजी आपल्या लोकांच्या पुढे उभे राहिले आणि मोठ्या आवेशात ते गरजले, "मर्दांनो , खानाशी झुंजायचंय, जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील  ) ते येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी, पळाल त्याला चोळी बांगडी" असे बोलून रामजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरहर केला. साक्षात जणू भवानीच संचरली. अवघ्या मराठा सैन्यानेही तसेच केले.
मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठा सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच. वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडे आठवले. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता. 

अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामजी पांगेरा दाखवून दिले की,
 मराठ्यांची पोरे आम्ही,
 भिणार नाही मरणाला.
 चिमूटभरांनी पराभव     
  केला परातभरांचा
 कण्हेरा गड सुरक्षित होता . दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती.
 नमन या वाघाच काळीज असलेल्या आणि इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या  शूरवीराला.

Post a Comment

0 Comments