Advertisement

ऐतिहासिक_अचलपूर, जिल्हा अमरावती

#ऐतिहासिक_अचलपूर, जिल्हा अमरावती

अचलपूरचा इतिहास म्हणजेच #वऱ्हाडचा_इतिहास’ असा अभिमानपूर्वक उल्लेख ज्या शहराबद्दल केला जातो, ते अचलपूर (आणि परतवाडा) आता पार बदलून गेले आहे. संपन्नतेची साक्ष पटवणाऱ्या खुणा तेवढय़ा शिल्लक आहेत, इतकी ती संपन्नता लयास गेली आहे. या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे गतकाळातील वैभवाची साक्ष पटते.

अचलपूर किंवा एलिचपूर- इतिहासाला सुमारे दिड सहस्रकापासुन ज्ञात असलेली एक प्राचीन नगरी. या शहरात मध्ययुगीन कालखंडातील अनेक प्राचीन स्थापत्य अवशेष आजही सुस्थितीत दिसतात. या शहराला हा वारसा जतन करण्याची व येथील इतिहास जाणून घेण्याची आज आवश्यकता आहे.

अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेले एक महत्वाचे तालुक्याचे शहर. अचलपुर शिवाय वऱ्हाडचा इतिहास पुर्ण होऊच शकत नाही असे या शहराबाबत म्हटले जाते. जैनधर्मीय इल राजाने हे नगर वसवल्याने त्याला एलिचपूर  असे नाव पडले व काळाच्या ओघात त्याचे अचलपुर झाले. काही काळ विदर्भाची राजधानी असलेले हे शहर बिच्छन नदीतीरावर एका भुइकोटाच्या आत वसलेले असुन मध्ययुगीन काळात वऱ्हाडातील एक महत्वाचे ठिकाण होते. मध्ययुगीन काळातील वैभवाची साक्ष देणाऱ्या वास्तु आजही या शहरात विखुरलेल्या अवस्थेत पहायला मिळतात. अचलपुर किल्ला अमरावती बुऱ्हाणपूर मार्गावर अमरावती पासुन ५० कि.मी.अंतरावर तर परतवाडा शहरापासुन ४ कि.मी.अंतरावर आहे. अचलपुर शहरात आपला प्रवेश या किल्ल्याच्या दरवाजातूनच होतो. भक्कम पोलादी तटबंदीत असलेल्या या शहरात आजही त्याच्या सौंदर्याने नटलेल्या वास्तु दुर्लक्षित झालेल्या आहेत. शहराभोवती असलेली भक्कम तटबंदी, त्यातील बुरुज व कोरीवकामाने सजलेले सहा बुलुंद दरवाजे आजही या शहराचे वैभव आहे.

Post a Comment

0 Comments